उष्माघाताने शेतमजूराचा दुदैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथील रहिवासी शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (वय – ३६) यांचे दि. १० एप्रिल रोजी दुपारी शेतात काम करत असतांनाच दुर्दैवी निधन झाले. ही वार्ता माहीत पडताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरसाडे तांडा येथील भूमीहीन शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण हा आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी, एक मुलगी व दोन मुलांसह एकत्रित कुटुंबात रहात होता. स्वताची शेतजमीन नसल्याने काम केले तर खायला मिळेल अशी परिस्थिती होती. म्हणून प्रेमसिंग हा शेतमजूरी तर कधी जे. सी. बी. चालवण्यासाठी जायचा. दि. १० एप्रिल २०२३ रोजी प्रेमसिंग नियमितपणे शेतात काम करण्यासाठी गेलेला होता. काम करत असतांनाच दुपारी वाजता तो अचानकपणे चक्कर येऊन बेशुद्ध होऊन खाली पडला प्रेमसिंग अचानक जमीनीवर पडल्याचे पाहून सोबतच्या मजूरांनी त्याला उचलून नेत सावलीत घेऊन शुध्दीवर आणण्यासाठी तोंडावर पाणी मारुन, मारुन तसेच हलवून शुध्दीवर आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु प्रेमसिंगची हालचाल पूर्णपणे थांबली होती म्हणून प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण याला त्याच अवस्थेत पिंपळगाव हरेश्वर येथील डॉ. नितिन चव्हाण यांच्या दवाखान्यात आणण्यात आले डॉ. चव्हाण यांनी प्रेमसिंग चव्हाण यांची तपासणी करुन मृत घोषित केले. अंबादास भिका राठोड (वय – २७) यांचा दि. ६ एप्रिल २०२३ गुरुवार रोजी सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा गावाजवळ विज पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आज प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण याचा शेतात काम करतांना उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वरसाडे तांड्यावर शोककळा पसरली आहे. या दोघांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

Protected Content