उद्धव ठाकरे गँगप्रमुख आहेतच, सुधीरभाऊंनी सेनेच्या नादी लागू नये ; गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर

 जळगाव : प्रतिनिधी  । शिवसेना प्रमुखांचे पुत्र गँगप्रमुख आहेतच. ते आम्ही मान्य करतो. ते शिवसेनेचे गँगप्रमुख आहेत. तुमच्या गँगप्रमुखांची काय कामं चालू आहेत हे आम्हाला माहितीये. त्यांनी कृपा करून शिवसेनेच्या नादी लागू नये”, असं पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

 

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणात सत्ताधारी मित्रपक्ष काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपा या दोघांनाही नाव न घेता खोचक टोला लगावला. कोरोना काळात राजकारणाच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधकांना सुनावलं देखील. यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी “हे सत्ताप्रमुखाचे नव्हे तर गँग प्रमुखाचे भाषण आहे”, अशी टीका केली होती. त्यावर आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं असून शिवसेना आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांना  खोचक सल्ला दिला आहे.

 

गुलाबराव पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांना परखड शब्दांमध्ये सुनावलं आहे. “शिवसेना पक्ष प्रमुख हे शिवसेनेचे गँगप्रमुखच आहेत. त्या गँगप्रमुखाच्या बापाने काय केलंय हे आख्ख्या महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. गँगप्रमुखाच्या नादाला लागू नये. कारण गँगप्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होतं हे मुंबईच्या सेनाभवनासमोर सुधीरभाऊंनी पाहिलं आहे. त्यामुळे टीका करताना सुधीरभाऊंसारख्या नेत्यानं अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे असेही ते  म्हणाले .

 

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली होती. “शिवसेना वर्धापन दिनाचं उद्धव ठाकरेंचं भाषण सत्ताप्रमुखाचं नसून गँग प्रमुखाचं भाषण आहे. २ दिवसांआधीच यांनी आपण गुंड आहोत असं सांगितलं. आता काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा केली जात आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले होते. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला सुनावलं होतं. “स्वबळ म्हणजे काय? कोरोना काळात देशातील, महाराष्ट्रातील नागरिक अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता लक्षात न घेता स्वबळाचा नारा दिला. आम्ही स्वबळावर आणू असं म्हटलं, तर लोक जोड्यानं हाणतील. लोक म्हणतील तुझी सत्ता तुझ्याकडे ठेव आणि माझ्या रोजीरोटीचं काय ते सांग. तुझं बळ तू वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार? हा विचार आपण केला नाही, तर आपला देश अस्वस्थतेकडे चालला आहे हे निश्चित”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

 

Protected Content