उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ ; मुख्यमंत्रिपद राहणार कायम

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची आज शपथ घेतली.

 

 

राज्यावर करोनाचं संकट असल्याने नेहमीप्रमाणे भव्य कार्यक्रम न घेता विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या.कोणताही गाजावाजा न करता मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांनी २७ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्यातरी सभागृहाचं सदस्य होणे बंधनकारक होते. २७ मे रोजी सहा महिने पूर्ण होत असल्याने त्यापूर्वीच ते विधानपरिषदेचे सदस्य झाल्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला आहे. दरम्यान, शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलम गोऱ्हे, भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी आज शपथ घेतली.

Protected Content