ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही- तृणमूल व बसपाने बदलली भूमिका !

नवी दिल्ली । आधी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन म्हणजेच ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करणार्‍या तृणमूल काँग्रेस आणि बसपाने आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.

गत काही निवडणुकांमध्ये आणि विशेष करून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर बहुतांश पक्षांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. तसेच यापुढे मतदान मतपत्रिकेवर घेण्याचीही आग्रही मागणी केली होती. मात्र आता एका संसदीय समितीने ईव्हीएममधील फेरफारीच्या शंका फेटाळून लावल्या आहेत. या समितीमध्ये ईव्हीएमविरोधात आघाडी उघडणार्‍या तृणमूल काँग्रेस आणि बीएसपी या पक्षांच्या खासदारांचाही समावेश होता. संबंधित समितीने आपला अहवाल नुकताच राज्यसभेत सादर केला. यामध्ये बनावट मतदान बंद करणे, मतपत्रिकांच्या मोजणीसाठी होणारा विलंब आणि चुका दूर करण्यासाठी ईव्हीएमचे कौतुक करण्यात आले. तसेच तृणमूल काँग्रेस आणि बीएसपीच्या खासदारांचा सहभाग असलेल्या समितीने स्थानिक निवडणुकांमध्येही ईव्हीएमचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

मतदारांच्या सोईसाठी स्थानिक निवडणुकांमध्ये ही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात यावा, अशी शिफारस या संसंदीय समितीने राज्य निवडणूक आयोगांना केली आहे. तसेच या शिफारशींना विरोधी पक्षांच्या कुठल्याही सदस्याने विरोध दर्शवला नाही.

तसेच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट आल्यामुळे मतदारांचा विश्‍वास वाढण्यास मदत झाली आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेतील विश्‍वासार्हता वाढली आहे. तसेच सुप्रीम कोर्टानेही मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारे मतदान घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content