आरोग्यमंत्री टोपे यांचे रुग्णालयातून महाराष्ट्राला कळकळीचे आवाहन

 

मुंबई : वृत्तसंस्था । पुन्हा लॉकडाउनचं संकट ओढवून नये, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे.

 

कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून राज्यभर पायाला भिंगरी बांधून दौरे करणारे  आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या स्वतः कोरोनाविरुद्ध लढाई देत आहेत. राजेश टोपे रुग्णालयात असतानाच महाराष्ट्रावर पुन्हा संकट घोंगावू लागलं आहे. मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये उद्रेक होताना दिसत असून, या  विषाणूचा प्रसार झपाट्यानं होत असल्यानं राज्य सरकार पुन्हा लॉकडाउन करण्याच्या विचारात आहे.

 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मागील आठवड्यात संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राजेश टोपे रुग्णालयात दाखल झाले होते. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वेगानं वाढत असून, आठ दिवसांत रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास लॉकडाउन लागू करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिले आहे.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. “गेल्या वर्षभरापासून आपण ही  लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे  वर्षभरापासून विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो.  हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु कोरोनाला माझ्याजवळ येणं जमलं नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्बावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा सामूहिक लढातईत सहभागी होणार आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

 

 

“समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाउन काळात सर्व जनतेने  संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाउन परवडणार नाही. लॉकडाउन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाउन टाळा. शेवटी स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया कोरोनाला. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने,” असं आवाहन टोपे यांनी महाराष्ट्राला केलं आहे.

Protected Content