आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सुरु करणार स्वत:चा आयटी सेल

 

 

भोपाळ : वृत्तसंस्था । काळाची पावलं ओळखत आता संघानेही आयटी सेल सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.

 

हिंदी पट्ट्यातील  उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चित्रकूटमध्ये  पाच दिवसांपासून सुरु असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठक आज संपली. या बैठकीमध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.   राजकीय विचारमंथनही झालं. बैठकीदरम्यान संघाचे संचालक मोहन भागवत यांनी बरेच महत्वाचे बदल संघटनेमध्ये करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत.

 

संघाने संघटनेला आणखीन मजबूत करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत संघाचं काम पोहचवण्यासाठी आयटी सेल सुरु करण्याचं ठरवलं आहे.

 

आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्यांना या माध्यमातून संघ संधी देणार आहे. मात्र संघाचा आयटी सेल हा भाजपाच्या आयटी सेल पेक्षा वेगळा असेल. या बैठकीमध्ये प्रचारकांच्या माध्यमातून संघाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   संघाने कू या अ‍ॅपलाही पसंती दिल्याचं वृत्त   आहे. त्यामुळेच आता संघ कू या भारतीय बनावटीच्या अ‍ॅपपासून ते प्रतिष्ठित सोशल नेटवर्कींग साईट्सवरुन आपल्या कामाचा प्रचार सुरु करणार आहे.

 

पश्चिम बंगालसंदर्भात मोठा निर्णय या बैठकीमध्ये घेणा्यात आलाय. पश्चिम बंगालमध्ये संघटनेची पाळंमुळं मजबूत करण्यासाठी राज्याची तीन खंडांमध्ये विभागणी करुन काम करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य कार्यालय कोलकातामध्ये असेल, मध्य बंगालमधील कारभार वर्धमानमधून पाहिला जाईल तर राज्यातील उत्तरेकडील भागामधील संघाचं काम सिलीगुडीमधून हाताळलं जाईल. पुढील वर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाने ही रचना केल्याचं सांगितलं जात आहे.

आरएसएसच्या चिंतन बैठकीमध्ये प्रांत प्रचारकांना त्यांच्या कामाचं स्वरुप समजावून सांगण्याबरोबरच पुढील वर्षभरामध्ये संघाकडून काय काय कार्यक्रम आखण्यात आले आहेत याची कल्पना देण्यात आली आहे. संघाने काही महत्वाच्या पदांमध्ये बदल केला आहे. दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक जलधर महतो यांना सह क्षेत्र प्रचारक ही जबाबदारीही देण्यात आलीय. तर प्रांत प्रचारक प्रशांत भट्ट यांना दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पूर्वेकडील ओडिसा आणि बंगालच्या प्रांतामधील सह क्षेत्र प्रचारक रामापदो पाल यांच्यावरही नवीन जबाबदारी सोपवण्यात आलीय.

 

क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशींना अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचं मुख्य कार्यालय चंढीगडमध्ये असेल. त्याचप्रमाणे आता भैय्याजी जोशींना संघ आणि विश्व हिंदू परिषदेदरम्यानचे संयोजक असतील. तसेच डॉक्टर कृष्ण गोपाल यांनान विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवण्यात आलं आहे. सर कार्यवाहक अरुण कुमार यांना संघ आणि भाजपामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

संघाने आता मुस्लीम बहुल भागामध्ये शाखा सुरु करण्याचा निर्णयही घेतलाय. चित्रकूटमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये कोरोना कालावधीत बंद पडलेल्या संघाच्या कार्यक्रमांबरोबरच शाखाही पुन्हा सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. विशेष म्हणजे आता संघाने देशभरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. केवळ मोठ्या आणि लहान शहरांमध्ये असलेला संघाचा प्रभाव आता गावागावांमध्ये पोहचवण्यासाठी या बैठकीमध्ये रणनिती आखण्यात आली आहे. केवळ हिंदूच नाही तर मुस्लिमांनाही संघाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्यासंदर्भातील धोरणही या चिंतन बैठकमध्ये निश्चित करण्यात आलं आहे.

 

 

Protected Content