आंदोलक शेतकरी दिल्लीत येणार असल्याच्या चर्चेने पोलीस सतर्क

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे ५० हजार  शेतकरी  दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सर्व सीमेवर बंदोबस्त वाढवला

 

शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तिव्र होतांना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. मात्र, अशी कोणतीही योजना नसल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांना पानिपत टोल प्लाझावरून सिंघू सीमेच्या दिशेने येण्यास सांगितले असल्याची माहिती मिळाली होती. परंतु त्यांच्या पोस्टर्समध्ये दिल्लीत प्रवेश करण्याविषयीही बोलण्यात आले होते. यानंतर सर्व सीमावर्ती ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यासह पोलिसांनी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर हद्दीतही चौकशी वाढविली आहे.

 

गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ शेतकरी दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर नवीन कृषी कायद्याचा निषेध करत आहेत. करोना काळात देखील शेतकरी आंदोलन करत होते. एक दिवसापूर्वी संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतची हमी देणारा कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी पुन्हा एकदा केंद्र सरकारला केली. इंधनाचे दर आणि इतर वस्तूंच्या वाढीमुळे शेतकरी आपल्या पिकाचा खर्चही वसूल करू शकत नाही, असे शेतकऱ्यांनी म्हटले होते.

 

संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे पंजाबी गायक जाझी यांचे ट्विटर अकाऊंट बंद केल्यामुळे सरकारवर टीका केली. सरकार चळवळ कमकुवत करुन समर्थन देणाऱ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस उपायुक्तांच्या पथकाने परिस्थितीची पाहणी केली आणि शांततापूर्ण परिस्थिती राखण्यासाठी व्यवस्था केली. तसेच अनेक ठीकाणी बॅरिगेट्स लावले आहेत. सोबच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळेस कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Protected Content