अरे व्वा… जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर देशापेक्षा सहा टक्क्यांनी अधिक !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या मृत्यू दरामुळे देशभर गाजलेल्या जळगाव जिल्ह्यास दिलासा देणारी माहिती आता समोर आली आहे. जिल्ह्यात आता रूग्ण बरे होण्याचा दर हा देशापेक्षा सहा टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात आजपर्यंत आढळून आलेल्या २०७४ कोरोणा बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १२५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यापर्यत पोहोचले आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा हाच दर ५०.४ इतका असून देशाचा हा दर ५३.८ इतका आहे. देशाच्या या दरापेक्षा जळगाव जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा सहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वेळेत तपासणी व योग्य उपचारामुळे जिल्ह्यात रूग्ण बरे होत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहून काळजी घ्यावी. विनाकारण बाहेर फिरू नये. बाहेर जाताना तोंडाला मास्क लावावा. सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जेणेकरून कोरोनाची साखळी तोडणे सहज शक्य होईल, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने केले आहे.

Protected Content