अमोल शिंदेंनी पराभवाच्या धक्क्यातून सावरून बालीशपणा सोडावा — अॅड. अभय पाटील

 

 

 

पाचोरा : प्रतिनिधी । भाजप तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी पराभवाच्या धक्क्यातून सावरून यापुढे तरी बालिशपणा सोडावा , अशी टीका करीत आज शिवसेनेचे  ऍड अभय पाटील यांनी केली

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचा धक्का अमोल शिंदे विसरलेले नाहीत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काळात कोरोना आजाराचे निर्मुलन करण्यासाठी व कोरोना ला अटकाव आणण्यासाठी ज्या संयमाने व धीराने नियोजन करून आपल्या कामाची चुणूक दाखवली व उत्तर प्रदेशात एकीकडे गंगेत प्रेते वाहत असतांना महाराष्ट्रात मात्र आरोग्य यंत्रणा प्रचंड सामर्थ्याने कोरोना लढ्यात उभी केली.  आमदार किशोर पाटील यांनी कोरोना काळात  मतदारसंघात किराण्यापासून ते औषधांपर्यंत तसेच रेमडेसेवीरपासून फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यासाठी उकडलेले अंडे पोहाचविण्यापर्यंत रात्रीचा दिवस करून परिश्रम घेतले. पाचोरा – भडगाव मतदारसंघात विकास कामांची तुफान मेल सुसाट ठेवली या सर्व गोष्टीमुळे भविष्यात निवडणुकीत आता आपली डाळ शिजणार नाही याची अमोल शिंदे यांना प्रचंड अस्वस्थता आलेली आहे. आप्पांच्या वेगवान कामगिरीमुळे काही विरोधकांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना आता चांगल्या मानसोपचार तज्ञाकडून उपचाराची गरज आहे , असेही ते म्हणाले .

 

भाजपचे तालुका अध्यक्ष यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर बेताल, तथ्यहीन आरोप केलेले आहेत. मतदार संघाचा कोणताही अभ्यास न करता आमदारावर केलेले बिनबुडाचे आरोप हास्यास्पद आहेत. अमोल शिंदे यांनी आ. किशोर पाटील दुधाचा भावासंदर्भात जाब विचारने म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सन – २०२० मध्ये भाजपने जिल्ह्यात दुध दर वाढीच्या संदर्भात आंदोलन केले. त्याचा अगोदर केंद्र सरकारने अमेरिकेच्या दुध उत्पादनासाठी व अमेरिकेच्या डेअरी उद्योगाला फायदा पोहचविण्याचा उद्देशाने देशाची बाजारपेठ खुली केली. यामुळे जळगावसह देशातील दुध उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. दुध आयातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे देशात अतिरिक्त उत्पादन होत असलेल्या दुधाला योग्य भाव मिळत नाहीत. मात्र हे सत्य सांगायची भाजपा तालुका अध्यक्ष यांना लाज वाटत असावी. त्यांनी अगोदर मोदी सरकारचा दुध आयातीच्या निर्णयाचा जाहीर निषेध करावा आणि मग बालिश बडबड करावी. त्याच प्रमाणे अमोल शिंदे यांनी आरोप करतांना विज मंडळाकडे मागील काळात ओईल व साहित्य नसतांना आ. पाटील यांनी काय प्रयत्न केले ? असा बालबोध प्रश्न केला आहे. अमोल शिंदे यांना अध्यक्ष होवून खूप कमी कालावधी झालेला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतर्फे विनंती कि त्यांनी अगोदर मतदार संघासोबतच महाराष्ट्राच्या दैनंदिन समस्याबाबत अगोदर सखोल अभ्यास करावा २०१४ पासून ते २०१९ – २० पर्यंत भाजपच्या फडणवीस सरकारने जो कर्जाचा प्रचंड डोंगर उभा करून ठेवला त्यामुळे ३१ मार्च, २०२० ला महाराष्ट्राच्या वीज कंपनीला २६ लाख१७ हजार १७७ कोटी रुपये इतका तोटा झाला होता. त्यामुळे वीज कंपनी आजपर्यंत स्वताला सावरू शकली नाही. अशात मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचे जी. एस. टी. चे हजारो कोटी रुपये दिलेले नसल्याने व सत्ता स्थापने नंतर लगेचच कोरोना आजाराने विळखा घातल्यामुळे ठाकरे सरकारला मागील सरकारने केलेला कर्जाचा डोंगर फोडून वीज मंडळासाठी व इतर उपाय योजनासाठी काम करता आलेले नाही. भाजप सरकारने केलेले हे कर्जाचे पाप लपविण्यासाठी आ. किशोर पाटील यांच्यावर आरोप करण्याचे उद्योग अमोल शिंदे करीत आहेत , असेही त्यांनी सांगितले .

आमदार किशोर पाटील यांनी आपल्या मतदार संघातील मागण्यांच्या संदर्भात वेळोवेळी सरकारकडे दाद मागितलेली आहे. त्यांच्या  लढवय्या व आक्रमक कार्यशैलीमुळे अमोल शिंदे यांची विचारशक्ती नष्ट झालेली आहे. आपण आता मागील निवडणुकीसारखे करोडो रुपये वाटून देखील आमदार होवू शकत नाही. हे सत्य पचविणे अमोल शिंदे यांना फार अवघड झाले आहे. तालुका भाजपमध्ये अमोल शिंदे यांच्या विरोधात जुन्या पदाधिकार्यांचा गट सक्रीय झाल्यामुळे आपले अस्तित्व पक्ष श्रेष्टीपुढे दाखविण्यासाठी जनतेच्या  प्रश्नावर  सरकारशी रस्त्यावर भांडण्यापेक्षा अमोल शिंदे पत्रकार परिषदा घेत आहेत. पाचोरा भडगाव मतदार संघाप्रमाणेच देशात महागाईने उच्चांक गाठ्लेला आहे. पेट्रोल १०० रुपया पुढे व डीझेल १०० रुपयापर्यंत पोहचले तरी व दैनदिन अन्नधान्य, भाजीपाला प्रचंड महाग झाला तरी अमोल भाऊ या प्रश्नावर एक शब्दानेही बोलायला तयार नाहीत. आपले ठेवायचे झाकून या नीतीने भाजप पदाधिकारी प्रश्न सोडविण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुका शोधण्यामध्ये मग्न आहेत असेही ते म्हणाले .

जिल्हा शिवसेनेमध्ये कुठलाही वाद नाही पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आमदार किशोर पाटीलसह सर्व शिवसैनिकासाठी पितृतुल्य आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय सर्व शिवसैनिकांना मान्य आहेत. त्याला कोणीही अपवाद नाही. सोशल मिडियाचा आधार घेवून अमोल शिंदे यांनी आमच्या संघटने बाबत केलेली वक्तव्ये चुकीची  आहेत. आमच्या संघटनेवर बोलण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या भाजप पक्षाचे मूल्यमापन करावे. संघाच्या आदेशावर नाचणाऱ्या पक्षाच्या पदाधिकार्यांनी किमान या गोष्टीची जाणीव ठेवावी , असेही ते म्हणाले .

पाचोरा शिवसेनेतर्फे वीज मंडळाच्या  अनागोंदी कारभाराच्याविरुद्ध तीव्र आंदोलन केले गेले. पाचोर भडगाव मतदार संघातील विरोधक सक्षम असते व मतदारसंघातील जनतेप्रती त्यांना आपल्या जबादारीची जाणीव असती तर बंद खोलीत ए. सी. मध्ये बसून पत्रकार परिषदेमध्ये भीमदेवी  थाटात गर्जना करण्याऐवजी रस्त्यावर उतरून लोकांचे विजे संदर्भात प्रश्न मांडले असते. अमोल शिंदे हे पाचोर भडगाव तालुक्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहि ते डायरेक्ट मुंबई, जळगाव सारख्या ठिकाणी पक्षाने केलेल्या कार्यक्रमात आयते सहभागी होतात. शिंदेच्या या धडपडीबद्दल शिवसेनेला त्यांची कीव येते असेही ते म्हणाले . यावेळी अॅड. अभय पाटील, किशोर बारावकर, शरद पाटील, चंद्रकांत धनवडे आदी उपस्थित होते

 

Protected Content