अमृत, भुयारी गटारींचे काम बंद करून अगोदर चाऱ्या बुजवा; महापौर भारती सोनवणे यांच्या सुचना

जळगाव प्रतिनिधी । शहरात सुरू असलेल्या अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या कामासाठी गल्लोगल्ली चाऱ्या खोदण्यात आल्या असून नागरिकांना खड्डे आणि धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. दोन्ही योजनेच्या मक्तेदारांनी सध्या सुरू असलेले काम तिथेच थांबवून अगोदर खोदलेल्या चाऱ्या बुजवाव्या अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. 

महास्वच्छता अभियानात महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, नगरसेविका रंजना वानखेडे, रेश्मा काळे, मनोज आहुजा, भरत सपकाळे, गोकुळ पाटील, कुंदन काळे, विजय वानखेडे, सहआयुक्त पवन पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, एस.एस.पाटील, बाबा साळुंखे आदींसह इतर अधिकारी सहभागी होते.

प्रभाग १६, १७, १८ चा दौरा करताना अनेक नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेच्या तक्रारी केल्या. जागोजागी खड्डे पडलेले असल्याने पायी चालताना किंवा वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत असून धुळीमुळे आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी अमृत आणि भूमीगत गटारींची कामे त्वरित बंद करून अगोदर ज्याठिकाणी खोदले आहे त्या चाऱ्या दुरुस्त करण्याच्या सूचना मक्तेदाराच्या प्रतिनिधींना दिल्या.

मासुमवाडी परिसरात असलेला मोठा नाला दुसऱ्या बाजूला योग्य पध्दतीने जोडण्यात आलेला नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होत असल्याची समस्या नगरसेवकांनी मांडली असता नाल्याच्या दुरुस्तीकामी आणि नव्याने स्लॅब कल्व्हर्ट तयार करण्यासाठी इस्टीमेट तयार करण्याचे महापौरांनी सांगितले.

बुधवारी महास्वच्छता अभियानासाठी मनपाच्या ४३६ कायम कर्मचाऱ्यांपैकी ३९४ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३७६ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ४२ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर मक्तेदाराच्या २४ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.

दिवसभरात उचलला २८७ टन कचरा

सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातून २८७ टन कचरा संकलित करण्यात आला. एरव्ही दर दिवसाला सरासरी २७० टन कचरा संकलन केला जातो. मोहीम असलेल्या तीन प्रभागातून तब्बल १७ टन अतिरिक्त कचरा संकलन करण्यात आला. स्वच्छता मोहीममुळे इतर प्रभागात अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रभागात काही कामगार ठेवण्यात आले होते.

Protected Content