अतिवृष्टीग्रस्तानसाठी रस्त्यावरच्या लढाईचा शेट्टींचा इशारा

सांगली: वृत्तसंस्था । केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतक-यांना मदत न दिल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू,’ अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. ‘बिहारमधील आपत्ती काळात केंद्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठी मदत केली. महाराष्ट्रासाठी तितक्याच गतीने मदतीचा हात का पुढे आला नाही? केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांचे नुकसान लक्षात घेऊन मदत करणे गरजेचे आहे.’ असंही ते म्हणाले आहेत.

‘राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना मदत द्यावी केंद्र सरकारने पंचनाम्यांसाठी पथके पाठवावित, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र पाठवले आहे.

‘अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोलमडलेल्या शेतक-यांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी मागील वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी. केंद्र सरकारनेही हात झटकू नयेत. सरकारने वेळीच मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढाई लढेल.’

दरवर्षी ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होते. याच ऊस परिषदेतून उसाच्या दराची मागणी केली जाते. यंदा कोरोना संसर्गामुळे ऊस परिषद होणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही ऊस परिषद होणारच, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. सर्व नियमांचे काटेकोर पालन करून परिषद होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस आणि प्रशासनाने शेतक-यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Protected Content