जळगाव-भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, राजकारणातील अजातशत्रू नेतृत्व जळगाव जिल्ह्याने गमावले असून ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही, अशी श्रद्धांजली पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी हरिभाऊ जावळे यांच्या निधनावर दिली आहे.
शोकसंदेशात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे की, हरिभाऊ जावळे यांच्या निधनाने मनाला वेदना झाल्या. एक शांत , सुस्वभावी, अजातशत्रू व सोज्वळ नेता म्हणून हरिभाऊ कायम स्मरणात राहतील. लोकाभिमुख, केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते नेहमीच काम करत राहिले. विधानसभा आणि लोकसभेत जिल्ह्याचे नेतृत्व करताना आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने जळगाव जिल्ह्याची मोठी हानी झाली असून राजकीय, सामाजिक,शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. हरिभाऊ जावळे यांना व्यक्तीगत व समस्त जिल्हावासीयांच्या भावपूर्ण श्रद्धांजली अशी सहवेदना ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.