पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि एका वेब पोर्टल विरोधात तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी ही गंभीर तक्रार दाखल केली आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांच्या हत्येची चिथावणी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील काही महिने समाज माध्यमांवर टोकाच्या विद्वेशाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय एैक्याला तडा जातील, अशा अनेक पोस्टर सोशल मीडियावर पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असे वाटत होते. त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचे खाबिया यांनी म्हटले. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर आणि इतरांकडून सातत्याने युट्यूब, पोस्टमन पोर्टल आदी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.
आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.