जळगाव, प्रतिनिधी | केळी लागवडीसाठी आणि उत्तम उत्पादनासाठी नैसर्गिक पद्धतीने केलेली ‘झिरो बजेट शेती’ करणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज असून त्याद्वारे कृषी क्षेत्रात शेतकरी समृद्ध होऊ शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ.सुभाष पाळेकर यांनी केले.
जिल्हा सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीतर्फे शनिवारी २७ रोजी नैसर्गिक केळी लागवड चिंतन परिषद आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे सकाळी पद्मश्री डॉ.सुभाष पाळेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर येथील हेमंतसिंग चौहान, डॉ. गिरीश बोरसे, डॉ.रंजना बोरसे, डॉ.निखिल पाटील, संजय काबरा, आर.एन.महाजन उपस्थित होते. उद्घाटनानंतर डॉ. सुभाष पाळेकर हे दिवसभरात चार ते पाच सत्रात शेतक-यांना व उपस्थित कृषी प्रेमींना केळी लागवडीविषयी माहिती देणार आहेत. केळी लागवड व त्यातील अडचणी, विविध रोगांवरील उपाय यावर सांगितले. नैसर्गिक शेती कशी करावी, त्यातील नियोजन, व्यवस्थापन कसे करतात याबाबत सविस्तर माहिती दिली.राज्यभरातून आलेल्या तसेच जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी यावेळी त्यांचे अनुभव कथन करणार आहेत. केळी पिकांवर येणारे रोग, बेभरवशाची आणि लुटारू विक्री व्यवस्था, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांची स्थिती याविषयी त्यांनी सांगितले. डॉ.पाळेकर यांनी नैसर्गिक पद्धतीने केळी लागवड करण्यासाठी काय करावे याच्या टिप्स परिषदेत दिल्या. राज्यभरातून सुमारे १५० शेतकऱ्यांनी उपस्थिती दिली आहे.