जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वे चढत असतांना तोल गेल्याने एका ३९ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिल जाधव हे रावेर शहरात पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन दिवसांपुर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासरवाडीला पत्नी व मुलासोबत आलेले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी १० मार्च रोजी रात्र ९ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर रावेर येथे जाण्यासाठी आले होते. त्यावेळी रात्री ९ वाजता आलेली कामयानी एक्सप्रेसमध्ये चढत असतांना त्यांचा तोल गेल्याने ते रेल्वेखाली आले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.