अहमदनगर | मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विविध राजकारणी यावर भाष्य करत असून आता राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. तसेच कोणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे कोणताही चमत्कार होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.
अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलतांना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधली आहे, त्याला कोणताही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्र आलेले आहेत. सत्ता नसतानाही भाजप-शिवसेना २५-२५ वर्षे एकत्र काम करत होती. त्यामुळे भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केले पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील सहकारी असे वक्तव्य एका भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमात केले होते. या आधी भाजपाकडूनच अशी वक्तव्ये होत होती. परंतू ठाकरेंनीच असे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता विखे पाटील यांनीही याच प्रकारचे वक्तव्य केले आहे.