साडे तीन कोटींचा निधी तात्काळ खर्च करा : जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल कार्यालयासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात विकास कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी नगरपालिकेच्या कामांचाही आढावा घेतला.

या बैठकीस प्रांताधिकारी कैलास कडलक तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे सह विविध शासकीय कार्यालया चे प्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात विविध विकास कामांची आढावा बैठक घेतली बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की कृषी गणना मध्ये यावल तालुका राज्यात सर्वप्रथम आहे .यासह सातबारा संगणक संगणकीकरणात ही अव्वल आहे यासह पीक पाहणी जवळ जवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर असून ती लवकरच १००% पूर्ण होईल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या यावर्षी शेळगाव बॅरेज प्रकल्पातून गाळ उपसा होणार असल्याने गौण खनिज वसुलीत ही तालुका अग्रेसर राहील असे त्यांनी सांगीतले. तसेच आगामी काळात होवु घातलेल्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यावल तालुक्यात दोन ते तीन नवीन मतदान केंद्र वाढणार असल्याचे सांगून प्रांत अधिकारी कैलास कडलक आणी संबंधित अधिकार्‍यांसह मतदान केंद्राची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयाची एकूण सर्व काम पाहता तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे व त्यांच्या सर्व सहकार्याचे त्यांनी विशेष कौत्तुक करून अभिनंदन केले आहे.

त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथील पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस ठाण्यात कमी पडत असलेल्या इमारतीसाठी जुन्या तहसील कार्यालयातील दोन ते तीन खोल्या खाली करून देण्याचे तहसीलदार यांना आदेश दिले. यानंतर आयुष प्रसाद यांनी येथील नगरपरिषद ला भेट देऊन नगरपरिषदच्या सर्व विभागाच्या कामाचा आढावा घेतला.

याप्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले की शहरात फिरत असलेल्या घंटागाडीचा वेळापत्रक घेऊन नागरिकांच्या माहितीसाठी ते जाहीर करा. माझी वसुंधरा अंतर्गत डेटा एन्ट्री कडे लक्ष देत वृक्ष लागवड करून संगोपन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शहरातील अस्वच्छतेबाबत त्यांनी एक दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्याकरण्याची सूचना दिल्यात पालिकेच्या वसुलीबाबत त्यांनी सक्त ताकीद देत शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश देत मागील दोन ते तीन वर्षाची थकबाकी सप्टेंबर पर्यंत तर नियमीत वसुली आक्टोबर अखेर रपर्यंत करावी असेही त्यांनी प्रशासनास सांगितले.

यासह १५ वित्त आयोग सुमारे साडे तिन कोटी रूपयांचा निधी शिल्लक असुन या निधीला मागासवर्गीय वस्ती तथा विविध समाजघटकांच्या विकास कामात तात्काळ खर्च करावीत असे आदेश नगर परिषद प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

या विकास कामांच्या आढावा बैठकी मध्ये पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार मनोज खाखारे, गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, बाल विकास बाल व महिला विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहागीर तडवी, पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभागाचे अजय बावणे, आदिवासी प्रकल्प विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत माहुरे, नगरपरिषदचे मुख्याधिकारी हेमंत निकम, यावल पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश वाघ, पश्चिम वनविभागाचे वन परिक्षेत्रपाल सुनील भिलावे कृषी अधिकारी सागर सिनारे यांचे सह तालुक्यातील विविध शासकीय प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे येथील तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आर.के.प्रभू यांचे व्दारे लिखित मोहनमाला ’ हे पुस्तक देऊन स्वागत केले.

Protected Content