आ. बच्चु कडू यांच्या प्रयत्नांनी यावल नगरपालिकेला साडे सहा कोटींचा निधी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांनी व अनिल चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे यावल नगरपालिकेला विकासकामांसाठी साडेसहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

यावल शहरातील विविध भागातील रस्ते व विकास कामांसाठी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भुसावळ नगर पालिकेचेचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे प्रयत्नाने व आमदार बच्चू कडू यांचे मंत्रालयात सततच्या झालेल्या पाठपुराव्याने नगर विकास मंत्रालयाकडून साडे सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आले आहे. यावल नगरपालीका कार्यक्षेत्रातील गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या विकास कामासाठी निधी मंजूर झाल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या निधीच्या माध्यमातून यावल शहरातील तारकेश्वर मंदिरा लगतची संरक्षण भिंत बांधणे ८० लक्ष रुपये, बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्त्याचे डांबरीकरण व कॉंक्रीट दुभाजक बांधणे यासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यासोबत, येथील व्यास नगर पांडुरंग सराफ नगर व स्वामी समर्थ नगर मधील रस्ते यांचे डांबरीकरण करणे एक कोटी रुपये इतका निधी मिळाला आहे.

यासोबत, आयशा नगर, प्रभू लीला नगर, स्वामीनारायण नगर या वस्त्यांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण तथा गटारीचे कॉंक्रिटीकरण करणे यासाठी एक कोटी ७० लाख रुपये, श्री गजानन महाराज मंदिर परिसर बाबा नगर एकरानगर रजा नगर रस्त्याचे डांबरीकरण व गटारीचे कॉंक्रिटीकरण करणे एक कोटी रुपये; नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक ७०९,७१०,व ७१२ मध्ये रस्ते डांबरीकरण व साईड गटारी बांधणे ५० लाख रुपये ,डांगपुरा कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे ५० लक्ष असे सहा कोटी ५० लाख रुपयांचा निधी शहरासाठी मिळाला आहे.

यावल शहरातील क्षेत्र व विस्तारीत भागातील विविध वस्त्यामधील विकास कामासाठी निधी मंजूर झालेला आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. लोकसभेच्या निवडणूकआधी शहरातील विकासकामे गतीने व्हावीत अशी अपेक्षा येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह यावल शहर वासीयांकडून व्यक्त केली आहे.

Protected Content