जळगाव प्रतिनिधी । महिलांनी शारीरीक काळजीसोबत मनाची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. पुर्वी मासिक पाळीबाबत आई-मुलीमध्ये संवाद नसायचा आज काळ बदलला आहे. परंतु ग्रामीण भागात आजही मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज, अंधश्रध्दा आहे. महिलांनीच आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन उद्योजिका वैशाली विसपुते यांनी केले. युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि अचिवर्स डान्स अॅकेडमीतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित आठ दिवसीय मोफत झुम्बा शिबीराचा सोमवारी समारोप करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व 60 तरूणी, महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.
झुम्बा डान्स शिबिराचा समारोप
वैशाली विसपुते यांनी सांगितले की, मासिक पाळीबाबत आजही उघडपणे बोलले जात नाही. मासिक पाळी शाप नसून वरदान आहे. स्त्रीच्या शरीराच्या चक्राचा तो एक भाग आहे. मासिक पाळीच्या जनजागृतीसाठी आम्ही मासिक पाळी कापडमुक्त अभियान सुरू केले आहे. चांगलं काम करण्यासाठी कुठे तरी पुढाकार घ्यावा लागतो. भारत सक्षम करण्यासाठी महिला सक्षम होणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक महिलेने या कामासाठी पुढाकार घ्यायला हवा असे विसपुते यांनी सांगितले. युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी यांनी प्रास्ताविकात गेल्यावर्षी फाऊंडेशनतर्फे दिव्यांग सक्षमता हा विषय घेवून वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच यावर्षी महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन अचिवर्स डान्स अॅकेडमीचे संचालक राहुल वडनेरे यांनी तर आभार वसीम खान यांनी मानले. यशस्वीतेसाठी चंदन मोरे, अविनाश कोळी यांनी परिश्रम घेतले.