मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणे हा निव्वळ योगायोग नसून ते कौर्य आहे, असे म्हणत शिवसेना हा एनडीएचा एक संस्थापक पक्ष असून, कुणाच्या सहीने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढले, असा थेट सवाल शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे.
आजपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवेसेनेला संसदेत विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे शिवसेना भारतीय जनता पक्षावर चांगलीच नाराज झाला आहे. भाजपाने शिवसेना ‘एनडीए’त नसल्याची घोषणा रविवारी केली. भाजपाकडून करण्यात आलेल्या घोषणेचा खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी खासदार संजय राऊत दिल्लीत दाखल झाले आहे. एका वृत्तवाहिशी बोलताना राऊत म्हणाले, “शिवसेना ‘एनडीए’चा संस्थापक घटक पक्ष आहे. शिवसेेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एनडीएचे संस्थापक होते. जॉर्ज फर्नाडीस निमंत्रक होते. फर्नाडीस हे ‘एनडीए’तील सर्व घटक पक्षांशी संवाद साधायचे. ‘एनडीए’च्या नावाने टिव-टिव करणारे ज्यावेळी एनडीए स्थापन झाली, तेव्हा गोधडीत रांगतही नव्हते,”अशी बोचरी टीका राऊत यांनी केली आहे. तसेच शिवसेना हा संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) जाणार नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.