आदित्यच्या उमेदवारीवर काय म्हणाले राज ठाकरे ?

Aditya Thackeray raj thackery

 

मुंबई प्रतिनिधी । आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तिथे आघाडीने उमेदवार दिला असला, तरी मनसेने विरोधात उमेदवार उभा केलेला नाही. ‘हे एक चांगलं कृत्य (जेश्चर) आहे. तो निवडणूक लढवत असेल, तर त्याच्याविरोधात उमेदवार देता कामा नये, असे मला वाटतं, त्यांना काय वाटतं, हा वेगळा मुद्दा आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांची उमेदवारीची घोषणा सर्वात लक्षवेधी ठरली. आदित्य यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. यामुळे ठाकरे कुटुंबासाठी ही निवडणूक विशेष असणार आहे. दरम्यान काका राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून समर्थन केलं आहे. “निवडणूक लढवावी की नाही, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. उद्या माझ्या मुलाला निवडणुकीत उतरायचं असेल, आणि तो याबाबत ठाम असेल, तर मी नाही म्हणणार नाही. पण त्याला स्वतःविषयी खात्री वाटत नसेल तर कोण काय करु शकेल? असे राज ठाकरे म्हणाले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.

‘बाळासाहेब आधीपासूनच व्यंगचित्रकार होते. माझे आजोबा म्हणाले होते, की याला जे-जे स्कूल ऑफ आर्ट्सला पाठवू नका, याचा हात खराब होईल. जेव्हा उद्धव किंवा मी जे-जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं म्हटलं, तेव्हा त्यांनी नकार नाही दिला. त्यांनी आपली मतं आमच्यावर लादण्याचा कधी प्रयत्न नाही केला.’ हे उदाहरण देत आपल्या पुढच्या पिढीला निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. जर आमच्या मुलांना निवडणूक लढवावी असे वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नाही. त्यामुळे आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय? असे राज ठाकरे म्हणाले.

Protected Content