अमळनेर (प्रतिनिधी) भुसावळ ते बांद्रा टर्मिनल्स व्हाया अमळनेर,नंदुरबार या नव्यानेच सुरु झालेल्या खान्देश एक्स्प्रेस (गाडी क्र 19004)या रेल्वे गाडीचे अमळनेर स्थानकावर आज दुपारी साध्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
प्रत्यक्षात या गाडीचे वेळापत्रक वेगळे असताना काल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खान्देशात आगमन झाले असल्याने याच दिवशी भुसावल येथे हिरवी झेंडी दाखवून या गाडीचा शुभारंभ करण्यात आला.जळगाव,धरणगाव नंतर सायंकाळी 5.30 वा या गाडीचे अमळनेर स्थानकावर आगमन झाले. परंतु पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही बडेजाव पणा न करता साध्या पद्धतीने या गाडीचे स्वागत करण्यात आले. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रितपालसिंग बग्गा यांनी गाडीचे लोको पायलट निलेश राठोड व गार्ड अनिल चौधरी यांचा पुष्पहार टाकून सत्कार केला. तर अमळनेर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी इंजिनचे पूजन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी स्टेशन प्रबंधक एस. के. राय,सीएमआय किशोरकुमार नखाने तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष दिनेश रेजा,अनिल वाणी,प्रमोद पित्ती,गुलविरसिंग कालरा ,शाम लुला,निर्मलकुमार कोचर,प्रमोद अग्रवाल,डॉ इम्रान शाह,रॉकी पवार,डॉ पप्पू कोठारी,मंसा बग्गा,दीपक बारी,भरतसिंग परदेशी यासह पत्रकार व प्रवासी उपस्थित होते.
दरम्यान आठवड्यातून तीन वेळा ही रेल्वे धावणार असून अमळनेर स्थानकावर देखील थांबा देण्यात आला आहे. नियमित वेळापत्रकानुसार ही रेल्वेगाडी भुसावळहुन रविवार,मंगळवार व गुरुवारी सायंकाळी 5.40 वाजता निघेल व तेथून जळगाव ,धरणगाव व अमळनेर येथे रात्री 7.32 वा पोहोचेल. पुढे नरडाणा,शिंदखेडा,दोंडाईचा,नंदुरबार, नवापूर,बारडोली,उधना, नवसारी ,बलसाड ,पालघर , विरार , बोरीवली मार्गे प्रवास करून बांद्रा टर्मिनस (मुंबई) येथे सकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी पोहचेल.तसेच बांद्रा टर्मिनस गाडी क्र 19003 (मुंबई )हुन दर शनीवारी, सोमवारी व बुधवारी रात्री 11.50 वाजता सुटेल व अमळनेर येथे सकाळी 9.35 वाजता पोहचेल.तर भुसावल येथे दुपारी 12 वाजता पोहोचणार आहे. अमळनेर परिसरातून दररोज अनेक जण मुंबई प्रवास करीत असताना अमळनेर येथून थेट मुंबई जाण्यासाठी रेल्वे गाडी नसल्याने नंदुरबार मार्गे रेल्वे सुरु व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरु होती,अखेर या मागणीची पूर्तता झाल्याने शहर व परिसरातील जनतेची फार मोठी सोय झाली आहे.यामुळे सर्वांनी रेल्वे प्रशासनाने आभार व्यक्त केले आहेत.