आठ दिवसांत नियमावली तयार करुन मंदिर खुली करू

पंढरपूर, वृत्तसंस्था । आठ दिवसांत नियमावली तयार करुन मंदिर खुली केली जातील असं आश्वासन मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरातील आंदोलन मागे घेतलं.

विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून मंदिरं सुरु कऱण्यासाठी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी आश्वासन पूर्ण झालं नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊन आंदोलन करु असा इशारा यावेळी दिला.
प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी १५ जणांना त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देण्यात आली. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“मंदिर, मशीद, बुध्दविहार सुरु केली जातील असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. सरकार नियमावली तयार करत असून त्यासाठी आठ दिवस लागतील असं सांगितलं आहे. पण आदेश आला नाही तर पुन्हा पंढरपुरात आल्याशिवाय राहणार नाही,” असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. वंचितच्या आंदोलनाला यश आलं असून लोकभावनेचा आदर केल्याने सरकारचा आभारी असल्याचंही ते म्हणाले आहेत. ८५ टक्के लोक बरे झाले आहेत तर मग घाबरायचं कशाला ? अशी विचारणा करताना पुन्हा या प्रश्नावर लढायला आम्हाला लावू नका असंही ते म्हणाले.

याआधी प्रकाश आंबेडकर यांनी नियम मोडण्यासाठीच आलो आहोत सांगत आंदोलनाला जमलेल्या हजारोंच्या गर्दीचं समर्थन केलं. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, “या लोकांच्या भावना आहेत. “लोकच शासनाला दाखून देत आहेत. हे पाहून सरकारने आपली भूमिका बदलावी,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे असं सांगितलं असता लोक जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही हेच आम्हाला दाखवायचं आहे असं त्यांनी सांगितलं.

Protected Content