भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या (पूर्णा व तापी नदीच्या) पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे धरणाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने, सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणातून ५६ हजार क्युसेक्स (घनफूट प्रति सेकंद) इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
पाण्याचा विसर्ग करण्यासाठी हतनूर धरणाचे ४ गेट पूर्णपणे, तर १६ गेट प्रत्येकी १ मीटर इतके उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी आणि पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने तापी आणि पूर्णा नदीकाठावर राहणाऱ्या गावातील नागरिकांना विशेष सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी नदीकाठावर जाऊ नये, पाण्यात पोहणे टाळावे, मासेमारी करू नये, तसेच आपली गुरे-ढोरे नदीकिनारी बांधू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनीच योग्य ती दक्षता बाळगावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.



