यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चुंचाळे गावातील श्री समर्थ वासुदेव बाबांच्या दरबारात येत्या ९ मे रोजी गुरु-शिष्य परंपरेतील एका अनोख्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरु रघुनाथ बाबा आणि त्यांचे शिष्य वासुदेव बाबा हे दोघेही वैशाख शुद्ध बारसेच्या दिवशी समाधिस्त झाले होते, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक आहे.
चुंचाळे गावाची ओळख श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या तपोभूमी म्हणून आहे. काशीहून भ्रमण करत आलेल्या सुकनाथ बाबांनी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यांचे शिष्य आणि पुत्र श्री समर्थ रघुनाथ बाबा यांचा जन्म याच गावी झाला. पिता-पुत्रांच्या समाधी वर्डी (ता. चोपडा) येथे आहेत. सुकनाथ बाबा १९३५ मध्ये, तर रघुनाथ बाबा १९७९ मध्ये समाधिस्त झाले. रघुनाथ बाबांसोबत असलेले वासुदेव बाबा १९८० मध्ये चुंचाळे येथे आले. त्यांनी ग्रामस्थ आणि शिष्यांच्या सहकार्याने गावात भव्य मंदिराची स्थापना केली. मंदिराचा पाया सुकनाथ बाबांच्या कथनानुसार घातला गेला आणि याच दरम्यान गावकऱ्यांच्या घरांची बांधकामेही सुरू झाली. १९८९ मध्ये श्री रघुनाथ बाबांच्या मूर्तीची, तर २००० मध्ये २१ किलो चांदीच्या श्री समर्थ सुकनाथ बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ६१ फूट उंचीचा मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.
श्री समर्थ वासुदेव बाबा नेहमी आपल्या गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा यांची पुण्यतिथी वैशाख शुद्ध बारसेला आयोजित करत असत. त्यांनी देह सोडण्यापूर्वी, गुरुंच्या पुण्यतिथीचा सोहळा अखंड सुरू राहावा, अशी इच्छा व्यक्त केली आणि योगायोगाने तेही गुरुंच्या पुण्यतिथीच्याच दिवशी चुंचाळे येथे समाधिस्त झाले. त्यामुळे हा गुरु-शिष्य पुण्यतिथीचा सोहळा वासुदेव बाबांच्या दरबारात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आदल्या दिवशी महिला पिठाची जुळवाजुळव करतात आणि रात्री आठ वाजल्यापासून पुरणपोळी बनवण्याचे काम सुरू होते. सकाळी यंत्राद्वारे आंब्याचा रस आणि मसाले भाताची भाजी तयार केली जाते. ९ मे रोजी सकाळी ६ वाजता मारुती अभिषेक, ६:३० वाजता श्री समर्थ सुकनाथ बाबांच्या मूर्तीला स्नान आणि अभिषेक, त्यानंतर आरती होईल. सकाळी ८:३० पासून भजन आणि भारुडांचा कार्यक्रम रंगेल. दुपारी १२ वाजता महाआरती आणि त्यानंतर १ वाजता महाप्रसादाला सुरुवात होईल, असे आवाहन चुंचाळे ग्रामस्थांनी केले आहे.