दुदैवी घटना : पाण्याच्या टाकीत पडल्याने विवाहितेचा मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २० ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता अमळनेर शहरातील मराठा मंगल कार्यालय परिसरात घडली आहे. जयश्री सुनील चौधरी वय ४३ रा. मराठा मंगल कार्यालजवळ,अमळनेर असे मयत विवाहितेचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जयश्री चौधरी ह्या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २० रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नळाला पाणी आले म्हणून अंडर ग्राउंड पाण्याच्या टाकीत पाणी पातळी पाहायला गेल्या. बराच वेळ त्या परत आल्या नाहीत म्हणून त्यांचे पती सुनील चौधरी यांनी मुलगी कल्याणी हिला पाहायला पाठवले. मात्र जयश्री चौधरी दिसून आल्या नाहीत, म्हणून सुनील चौधरी बाहेर शोधायला निघाले. त्यावेळी टाकीचे झाकण उघडे दिसले म्हणून मुलगी कल्याणी हिने टाकीत डोकावून पाहिले असता जयश्री पाण्यात बुडालेल्या दिसल्या. काही लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.दरम्यान या दुर्दैवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. जयश्री चौधरी यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Protected Content