भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या रसायनयुक्त विषारी दारूविक्रीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत थेट मुंबईतील मंत्रालय गाठले. उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार सादर करत अवैध दारूविक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत योग्य उपाययोजना राबविण्याचे आश्वासन मंत्री पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जळगाव जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेबाबत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. भुसावळ, यावल, रावेर व मुक्ताईनगरसह ग्रामीण व शहरी भागात ‘पन्नी-फुगा’ नावाने रसायनयुक्त घातक दारूची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
ऑक्सिटोसिनसारख्या घातक रसायनांचा वापर करून तयार होणाऱ्या या विषारी दारूमुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून काहींना जीव गमवावा लागत असल्याचा गंभीर दावा तक्रारीत करण्यात आला. पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच हातगाड्यांवर उघडपणे होणाऱ्या या विक्रीला पायबंद घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.
तक्रारीत अवैध दारूविक्रीवर तात्काळ कारवाई, जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी आणि संपूर्ण सिंडिकेट उद्ध्वस्त करण्यासाठी कायमस्वरूपी प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष सोपान दुट्टे आणि मुक्ताईनगरचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ बागवान उपस्थित होते. या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत मिळाल्याने जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.



