Home Cities जळगाव विद्यापीठात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

विद्यापीठात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0
172


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रसायन अभियांत्रिकी व संलग्न विज्ञान क्षेत्रातील अद्ययावत संशोधन, नव्या तंत्रज्ञानाचा वेध आणि जागतिक स्तरावरील ज्ञानविनिमयासाठी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सज्ज झाले आहे. विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने “Advances in Chemical Technology and Allied Sciences” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून ही परिषद ६ व ७ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.

या परिषदेचे उद्घाटन मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या अधिसभागृहात होणार आहे. उद्घाटनप्रसंगी पद्मश्री प्रा. डॉ. जी. डी. यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. डी. कुलकर्णी हे विशेष अतिथी असतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी हे उपस्थित राहणार आहेत.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचा मुख्य उद्देश रसायन अभियांत्रिकी, रसायन तंत्रज्ञान तसेच संलग्न विज्ञान शाखांमधील नव्या संशोधन प्रवाहांवर सखोल चर्चा घडवून आणणे हा आहे. संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणून आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग-शैक्षणिक सहकार्य आणि संशोधनातील नव्या संधी यावर विचारमंथन करण्यात येणार आहे.

परिषदेसाठी देश-विदेशातील सुमारे ३०० विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक सहभागी होणार असल्याची माहिती परिषद समन्वयक डॉ. राजकुमार शिरसाम आणि युआयसीटीचे संचालक डॉ. ए. के. गोस्वामी यांनी दिली. या परिषदेमुळे उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना व संशोधकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनाची दिशा मिळेल, तसेच विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधनात्मक प्रतिमेला नवी उंची प्राप्त होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

एकूणच, रसायन तंत्रज्ञान आणि संलग्न विज्ञान क्षेत्रातील नव्या विचारांचे आदानप्रदान घडवून आणणारी ही आंतरराष्ट्रीय परिषद जळगावच्या शैक्षणिक विश्वासाठी मैलाचा दगड ठरणार असून संशोधन संस्कृतीला चालना देणारी ठरेल.


Protected Content

Play sound