जळगाव-फरजाज सय्यद । अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर निर्देशांनंतर जळगाव शहरातील अनेक हॉटेल, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये ग्राहकांसाठी “येथे पिण्याचे स्वच्छ पाणी मोफत उपलब्ध आहे” असे फलक झळकू लागले आहेत. या बदलाची शहरभर चर्चा सुरू असून, ग्राहकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांनी ग्राहकांना मोफत व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील काही नामांकित हॉटेलांवर अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर कारवाई केल्यानंतर राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम आता जळगाव शहरातही दिसून येत आहे.

पूर्वी अनेक ठिकाणी ग्राहकांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र बाटली खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. मात्र, अलीकडील प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर अनेक हॉटेल चालकांनी ग्राहकांसाठी मोफत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून, त्याबाबत स्पष्ट सूचना फलकही लावले आहेत.प्रशासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी कायम राहिल्यास ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



