भाजपशिवाय राज्यात सरकार अशक्य – चंद्रकांत पाटील

0chandrakant

मुंबई, वृत्तसंस्था | राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही. ज्यांच्याकडे ११९ आमदार आहेत, त्यांना घेतल्याशिवाय राज्यात कुणाचंही सरकार बनू शकणार नाही. राज्यात येणार सरकार भाजपचंच असेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.१५) केला. भाजपचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कालच भाजपशिवाय राज्यात कुणाचंही सरकार येणार नाही, असा दावा केला होता. त्यामुळे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपच्या चिंतन बैठकीतील माहिती दिली. यावेळी त्यांनी आमचीही राज्यातील राजकीय घडामोडींवर नजर असल्याचे सांगितले. भाजपचे १०५ आमदार असून आम्हाला १४ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमच्याशिवाय कुणाचेही सरकार बनू शकत नाही. फडणवीस यांनीही आजच्या बैठकीत हेच स्पष्ट केल्याचे सांगतानाच कुणाबरोबरही कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपच नंबर वन
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या बैठकीत विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करण्यात आले. एका सादरीकरणाच्या माध्यमातून भाजप कसा नंबर वन आहे, हेही दाखवण्यात आले. राज्यात भाजपला सर्वाधिक १ कोटी ४२ लाख मते मिळाली आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीला ९२ लाख आणि शिवसेनेला ९० लाख मते मिळाली आहेत. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत २६२ जागा लढल्या होत्या, त्यापैकी १२२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी १२४ जागा लढवून भाजपने १०५ जागा जिंकल्या आहेत. १९९० नंतर कोणत्याही पक्षाला शंभर जागा जिंकत्या आल्या नव्हत्या. मात्र शंभरपेक्षाही अधिक जागा जिंकण्याची किमया भाजपने केली आहे. काँग्रेस आघाडीलाही शंभर जागा जिंकता आल्या नाहीत, असं सांगतानाच भाजपच्याच सर्वाधिक १२ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत, असेही ते म्हणाले. भाजप ५९ जागांवर पराभूत झाली आहे. त्यापैकी ५५ जागांवर भाजपने दुसऱ्या क्रमांकांची मते घेतली आहेत. इतर पक्षातून आलेल्या २६ उमेदवारांपैकी १६ उमेदवार निवडून आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

‘राहुल गांधी माफी मागो आंदोलन’
यावेळी त्यांनी राफेलप्रकरणी भाजप देशव्यापी ‘राहुल गांधी माफी मागो’ आंदोलन छेडणार असल्याचेही सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेलप्रकरणी न्यायालयात माफी मागितली आहे. राफेलच्याच मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली होती. आता त्यांनी देशाचीही माफी मागायला हवी. त्यामुळे आम्ही ‘राहुल गांधी माफी मागो’ आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमदारांना मतदारसंघात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचनाही शेतकऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचा २३ हजार कोटींचा विमा आहे, तो त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासही सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुकीवर चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content