कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष … परिसर हळहळला !

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान त्यामुळे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने शेतात आपल्या सात वर्षाच्या मुलादेखील विष घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाळू भंगू पवार (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बाळू पवार हे बुधवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शेतात कापसावर फवारणी मारायचे कारण देत घरातून निघाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता शेतात विषारी औषध प्राषण केले. हा प्रकार बाळू पवार यांचा ७ वर्षांचा मुलगा रामेश्वर याच्यासमोरच घडला. लहान मुलाला आधी हा प्रकार समजला नाही. मात्र, विषप्राषण केल्यानंतर बाळू पवार यांना त्रास होवू लागल्यानंतर भांबावलेल्या रामेश्वरने बाजूच्या शेतात काम करत असलेल्या इतरांना बोलाविले. इतर शेतकऱ्यांना बाळू पवार यांनी विषप्राषण केल्याचे लक्षात आल्यानंतरच लागलीच जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरु असतानाच बाळू पवार यांचा मृत्यू झाला. बाळू पवार हे शेती करत होते. मात्र, सततची नापीकी, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांमुळे पीकांचे नुकसान होत होते. त्यात कुंटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाळू पवार यांनी कर्ज देखील घेतले होते. आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने भविष्यात पुन्हा पीकांचे नुकसान झाल्यास कर्ज वाढेल या भितीने बाळू पवार यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. बाळू पवार यांच्या पश्चात पत्नी लाचाबाई पवार, दोन मुलं, भाऊ असा परिवार आहे.

Protected Content