मुंबईत तीन हजार कोटींची जल तस्करी : शेलारांचा गंभीर आरोप

मुंबई प्रतिनिधी | मुंबईत दरवर्षी सुमारे तीन हजार कोटी रूपयांची जल तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप आमदार आशिष शेलार यांनी करून या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रण आयुक्त सी.डी. जोशी यांना पत्र लिहून आशिष शेलार यांनी मुंबईसह एमएमआरमधील पाणी चोरी व पाण्याचा होणारा बेसुमार उपसा याबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. तसेच यावर एस आय टी नियुक्त करुन चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरात १९,००० पेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत, ज्यापैकी १२,५०० बोअरवेल आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने २५१ जलकुंभांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी २१६ अवैध जलविहिरी असून यातील एकाच जलकुंभातून ८० कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याचेही बाब काही प्रसिध्दी माध्यमांनी समोर आणली आहे.

यावर कोणतेही नियमन किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवैध पाणी टँकर माफियांचे फावले असून मुंबई विभागात ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुंबईतील बेकायदेशीर व अनियंत्रित पाणी चोरीचा तपास करून त्यांना दंड आकारून ही चोरी थांबवणे आवश्यक आहे. मुंबईच्या विद्यमान भूजल संसाधनाच्या वापराची क्षमता  लक्षात घेऊन वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून पाणी वापराचे धोरण निर्धारित करणे अत्यावश्यक आहे. म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्य नगरपालिकांच्या समन्वयाने त्वरित याबाबत एक एसआयटी कमिटी गठीत करून चौकशी होणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

यात पुढे म्हटले आहे की, मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाची विद्यमान भूजल क्षमता याचा अभ्यास करुन पाणी उपसा किती प्रमाणात झााला पाहिजे याचे धोरण निश्चित करण्यात यावे. तसेच मुंबई आणि मु्बई महानगरातील मैदाने, बागा यांसाठी लागणारे पाणी याची आवश्यकता लक्षात घेऊन आवश्यक असणारे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सर्व महापालिकांनी स्वतःचे जलसंचयन धोरण ठरवून ते कार्यान्वयीत करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Protected Content