मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्रालयातील दालनांचा ताबा सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. त्यामुळे काही माजी मंत्र्यांनीही बंगले सोडण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘वर्षा’ बंगल्यावर राहण्यासाठी 3 महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे संयुक्त सरकार सत्तेवर येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मंत्र्यांची कार्यालये आणि मंत्रालयासमोर मंत्र्यांच्या बंगल्यांवर सामानाची बांधाबांध सुरु झाली आहे. तर फडणवीस यांनाही आता ‘वर्षा’ हे सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे. परंतू ‘वर्षा’ या निवासस्थानी फडणवीस यांना अजून काही दिवस मुक्काम वाढवून मिळाला आहे. शासकीय नियमानुसार बंगला सोडण्यासाठी कोणत्याही मंत्र्याला 3 महिन्यांचा अवधी मिळतो.