कौशांबी (वृत्तसंस्था) पंडित जवाहरलाल नेहरुंनी कुंभमेळ्याला दिलेल्या भेदीदरम्यान हजारो लोक चेंगराचेंगरीत मारले गेले होते, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर,सरकारची आणि नेहरुंची नाचक्की टाळण्यासाठी या संदर्भातील बातमी देखील दाबून टाकण्यात आली होती, असा दावा देखील मोदींनी केला आहे. ते उत्तर प्रदेशमधील कौशांबीत एका जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी मोदी म्हणाले की, ‘नेहरु कुंभमेळ्याला भेट देण्यासाठी आले होते, त्यावेळी तर फारशी गर्दीदेखील नव्हती. मात्र, तरीही चेंगराचेंगरी झाली आणि त्यात हजारो भाविक मृत्यू मुखी पडले. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना एक रुपयादेखील दिला गेला नाही. केवळ चेंगराचेंगरीच नव्हे, तर त्यानंतरदेखील जे घडले ते अतिशय असंवेदनशील होते. अन्यायकारक होते,’ असे देखील मोदी म्हणाले. परंतु यंदा कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक आले. पंतप्रधान स्वत: आले. मात्र कोणतीही चेंगराचेंगरी झाली नाही. कोणाचाही मृत्यू झाला नाही. सरकार बदलल्यावर व्यवस्था कशी बदलते, याचे हे उदाहरण असल्याचे मोदी म्हणाले.