मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना-उबाठाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना नारळ मिळणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यामुळे सरकारची अलोकप्रियता वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कठोर निर्णय घेऊन काही मंत्र्यांना घरी बसवणार आहेत. यात महायुतीतील तिन्ही पक्षांच्या काही मंत्र्यांचा समावेश असल्याचा दावा आज खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

याबाबत खासदार राऊत आज सकाळी म्हणाले की, फडणवीस यांनी दिल्लीत चर्चा केली असून यात शिंदे गटाचे संजय शिरसाठ, संजय राठोड, दादा भुसे, भरत गोगावले आणि योगेश कदम यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. अजितदादा पवार यांच्या गटाचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांच्या खात्यांवर टांगती तलवार आहे. तर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, निलेश राणे यांच्या मंत्रीपदांवर देखील गंडांतर येण्याची शक्यता असल्याचे राऊत म्हणाले. यामुळे राज्य सरकारमधील चारपेक्षा जास्त मंत्री घरी जातील असा दावा खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे.



