…तर काँग्रेस पक्ष बरबाद होईल : निरुपम यांचा इशारा

sanjay nirupam

मुंबई, वृत्तसंस्था | ‘काँग्रेसमध्ये ‘सिस्टिमॅटिक फॉल्ट’ (व्यवस्थात्मक बिघाड) निर्माण झाला आहे. केवळ माझ्याच नव्हे, खुद्द राहुल गांधी यांच्या विरोधातही कट रचला जात आहे. हे सगळे लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्ष बरबाद होईल,’ असा संतप्त इशारा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला आहे.

 

उमेदवार यादी जाहीर झाल्यापासून मुंबई काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकाही समर्थकाला तिकीट न मिळाल्यामुळे निरुपम यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. मुंबईत आज (दि.४) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. ‘मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष म्हणून मी सुचवलेल्या उमेदवारांशी खर्गे यांनी साधी चर्चाही केली नाही. मुस्लिम मतदार काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करतात. त्यामुळे मुंबईत मुस्लिमांना संधी द्यायला हवी, असे माझे मत होते. पण माझे अजिबात ऐकले गेले नाही. काही जिल्ह्यात तीन-तीन मुस्लिम उमेदवार आहेत, तर काही ठिकाणी एकही मुस्लिम उमेदवार नाही. काँग्रेसमध्ये रचनात्मक बिघाड झाला आहे. तो लवकरात लवकर दुरुस्त करायला हवा, असेही ते म्हणाले.

Protected Content