अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम : ना. सामंत

मुंबई, वृत्तसेवा । कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर मागील काही बैठकींमध्ये राज्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. माध्यामांशी संवाद साधतेवेळी त्यांनी माहिती दिली.

आपत्ती व्यवस्थापन समितीशी झालेल्या महत्त्वाच्या चर्चेनंतर समितीच्या सल्ल्यानुसार राज्य शासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगत ना. उदय सामंत यांनी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास नकार दिला. युजीसीकडून परीक्षा घेण्याचा अट्टहास असला तरीही कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळं उदभवणारा संभाव्य धोका पाहता आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सामंत म्हणाले. कोरोना परिस्थितीमुळं अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असलं तरीही परीक्षा घेऊच शकत नाही अशा प्रकारचा कोणताही जीआर राज्य शासनाकडून जारी करण्यात आला नव्हता. शिवाय सरकारमधील कोणाही व्यक्तीनं अशा धर्तीवरील वक्तव्य केलं नसल्याचं ना.  सामंत यांनी यावेळी सांगितले. ‘परीक्षा रद्द झाल्या तरी अभ्यास करा, आरोग्याची असुविधा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून परीक्षा रद्द केल्या गेल्या आहेत’, या वक्तव्यावर ना. सामंत यांनी जोर दिला. मुंबई, पुणे आणि इतरही ठिकाणी महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांचं रुपांतर कोरोना रुग्णालयांमध्ये करण्यात आली आहेत. त्यामुळं विश्लेषण आणि आढावा घेतला असता परीक्षा घेणं शक्य नसल्याचा निष्कर्ष समोर येतआहे, शिवाय कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत आहे त्यामुळं अखेर आधीच्याच निर्णयावर महाराष्ट्र राज्य सरकार ठाम आहे.

Protected Content