जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पतीसह सासरच्या मंडळींनी छळ करत झालेल्या जाचाला कंटाळून विवाहिता पल्लवी योगेश पाटील (३५) यांच्या  आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पती योगेश पाटीलसह सासरच्या चार जणांविरुद्ध बुधवार, ३ जानेवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहीतेचे वडील गणेश बन्सी चौधरी (रा. बहादरपूर, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादत म्हटले आहे की, त्यांची मुलगी पल्लवी हिचे योगेश पाटील यांच्याशी सन २०१२मध्ये लग्न लावून दिले.  तिला दोन मुली असून अधून-मधून ती माहेर येत होती. त्या वेळी तिने मुलगा होत नाही म्हणून सासरचे टोचून बोलतात व शारीरिक, मानसिक छळ करून मारहाण करतात, असे सांगितले होते. हा त्रास असह्य झाल्याने त्या सन २०१९मध्ये माहेरी निघून आल्या. काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी तिला घरी नेले. परंतू, त्यानंतरही छळ सुरूच होता. २१ डिसेंबर २०२३ रोजी पल्लवी यांनी वडिलांना फोन करून सांगितले की, पती नवीन घर मागत असून तुम्ही नवीन घर घेवून द्या नाही तर सासरचे लोक जीवंत ठेवणार नाही. अखेर २४ डिसेंबर रोजी सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून पल्लवी यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद पल्लवी यांच्या वडिलांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिली. त्या वरून बुधवार, ३ जानेवारी पती योगेश पाटील, सासरे प्रेमचंद पाटील, सासू इंदूबाई पाटील, जेठ देवानंद पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content