देशाला मोदींच्या रुपात सक्षम प्रधानमंत्री लाभले : ना.महाजन

WhatsApp Image 2019 07 13 at 7.07.08 PM

जामनेर(प्रतिनिधी):- भारताला मोदींच्या रूपाने एक कणखर व सक्षम प्रधानमंत्री लाभले असून त्यांच्या नेतृत्वाखाली आपला देश महासत्ता बनणार आहे. जगाच्या पाठीवर भारताचे नाव सर्वच बाबींंमधे अग्रगण्य राहील असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी केले.ते भारूडखेडा येथील पाझर तलावाच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती निता पाटील ह्या उपस्थित होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून जे.के.चव्हाण,शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जि.प.सदस्य अमित देशमुख, उपसभापती सुरेश बोरसे,प. स. सदस्य रमण चौधरी, नवलसिंग पाटील, तहसीलदार नामदेव टिळेकर, रामेश्वर पाटील, शिवाप्पा गोडंबे ,भारुड खेड्याच्या सरपंच कविता शेळके, मंगल राजपूत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी वृंदावन कन्स्ट्रक्शनचे संचालक दिग्विजय पाटील यांनी मान्यवरांचा सत्कार केला. प्रशांत सांगोर यांनी प्रास्ताविक केले. ना.महाजन पुढे बोलताना म्हणाले की, या पाझर तलावामुळे भारुड खेडा परिसरातील वीस हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून महिनाभरात याचे काम पूर्ण होईल. जामनेर तालुका हा सर्व बाजूने सुंदर तालुका बनविण्याचा आपण चंग बांधला असल्याचे ही महाजन यांनी सांगितले. राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यापासून गेल्या पाच वर्षात कुठेही लोडशेडिंग नाही. ट्रांसफार्मर जळाल्यास लगेच आपण उपलब्ध करून देतो. पूर्वी आंदोलने करूनही ३-४ महिने ट्रान्सफार्मर मिळत नव्हते . शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आपण दिला. गेल्या पन्नास वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मराठा समाजासाठी हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात यशस्वी मार्ग काढून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. पुढील पाच वर्षात ही भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असून मी पुन्हा मंत्री म्हणून आपल्यासमोर येईल. आपण पंचवीस वर्षापासून मला आमदार म्हणून निवडून दिले. यावेळेस ही माझा विजय निश्चित आहे. मात्र यावेळी एक लाखाचे मताधिक्य अपेक्षित असल्याचे सांगून ते शेवटी म्हणाले की देशभरात व राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांपासून प्रदेशाध्यक्ष सारखे भुईसपाट झाले.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ४० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असे भाकीतही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

Protected Content