नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ विमा योजनेचा लाभ मिळावा-खा. खडसे

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात झालेल्या शेती नुकसान तसेच सन २०१९-२० या वर्षातील हवामान आधारित फळ पिक विमा योजने अंतर्गत प्राप्त तक्रारी बाबत आज जिल्हाधिकारी कार्यलय येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षते खाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

जोरदार पाऊस व वादळामुळे मागील हप्त्यात जळगांव जिल्ह्यात झालेल्या शेती मुख्यता केळी बागांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले असून सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणे तसेच मागील वर्षीच्या हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतील जवळजवळ ३ हजार शेतकऱ्यांना एकवर्ष उलटून सुद्धा पिक विम्याचा लाभ मिळालेला नाही तरी त्यांना तांत्रिक त्रुटी दूर करून तत्काळ लाभ मिळावा. तसेच विमा कंपनीकडून केळी नुकसानीचे पंचनामे करतांना नुकसान कमी झाल्याचे दाखविण्यात येत असून पूर्णतः नुकसान झालेल्या केळी खोडांचेच नुकसान दाखविण्यात येत आहे परंतु ज्या केळीच्या खोडांना पाऊस व वादळाचा फटका बसलेला आहे परंतु ते उभे आहे अशा केळी खोडांपासून शेतकऱ्यांना कुठलाही फायदा नसून ते सुद्धा शेतकरी काढून टाकणार आहे अशा नुकसानीची सुद्धा दखल घेणे बाबत खासदार रक्षाताई खडसेंनी आढावा बैठकीत मुद्दा उपस्थित केला.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृ.उ.स.अनिल भोकरे, राहुल पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अरुण प्रकाश, तालुका कृषी अधिकारी रावेर एम.जी.भामरे, यावल तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, चोपडा तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, विमा कंपनी बजाज अलियान्स प्रतिनिधी कविश उमक, देविदास कोळी, समाधान अरुण पाटील, बँक ऑफ बडोदा सावदा, आयसीआयसीआय बँक जळगांव, मुक्ताईनगर, फैजपूर, खामगांव ई. बँक शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Protected Content