रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केळी उत्पादकांसाठी महत्त्वाच्या दरप्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने रावेरमध्ये प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील दरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली, मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बैठकीचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा सुरू आहे.
रावेर येथे आयोजित या बैठकीत केळीच्या दरांबाबत सखोल चर्चा अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात शेतकरी मोठ्या संख्येने अनुपस्थित राहिल्याने प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत काही ठराविक व्यापाऱ्यांनीच बैठकीत सहभाग नोंदवला. त्यामुळे केळी उत्पादकांच्या खऱ्या अडचणी आणि अपेक्षा समोर येऊ शकल्या नाहीत, अशी भावना व्यक्त होत आहे.

या बैठकीला प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसिलदार दिपा जेधे, जिल्हा निबंधक गौतम बलसाने, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सभापती प्रल्हाद पाटील, चोपडा सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती पांडुरंग पाटील, भाजपा नेते नंदकिशोर महाजन आणि बाजार समितीचे संचालक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदार पाटील, रोहित अग्रवाल, जयेश कुयटे, पंकज पाटील, राजेंद्र चौधरी, सोपान पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, सचिन पाटील, योगिराज पाटील, अमोल पाटील, सैय्यद अजगर, गोपाळ नेमाडे, हरीषशेट गनवानी, ज्ञानेश्वर महाजन, सिकंदर तडवी, पितांबर पाटील, छोटू पाटील, सुरेश चिंधू पाटील, सुनिल कोंडे, किशोर महाजन आणि संतोष अग्रवाल यांचीही उपस्थिती नोंदवली गेली.
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवण्यामागे दरांबाबतचा असंतोष, व्यापाऱ्यांवरील अवलंबित्व आणि मागील बैठकींमधून ठोस निष्कर्ष न निघाल्याची भावना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने आयोजित केलेल्या या चर्चासत्रातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे निर्णयप्रक्रिया एकतर्फी राहिल्याची टीका होत आहे.
दरम्यान, उपस्थित अधिकाऱ्यांनी केळी बाजारातील स्थिती, दरातील चढ-उतार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली. मात्र प्रत्यक्ष उत्पादकांचा सहभाग नसल्याने या चर्चेचे परिणाम कितपत प्रभावी ठरतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.



