अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला नुकसान झाला; संघाच्या मुखपत्राचा दावा

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून नवे सरकार कामाला लागले असले तरी निकालाचं कवित्व सुरूच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र ‘ऑर्गनायजर’मधील एका लेखात निकालाचं विश्लेषण करताना पक्षाच्या काही चुकीच्या निर्णयांवर व कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविश्वासावर बोट ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांना सोबत घेण्याची खरंच गरज होती का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळं युतीमध्ये अजित पवारांचं भवितव्य काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

२०१४ आणि २०१९ मध्ये पूर्ण बहुमतासह सत्ता मिळवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला. भाजपला स्वबळावर सरकार आणता आलं नाही. त्यामुळं आरएसएससह भाजपच्या समर्थकांमध्ये काहीशी निराशेची भावना आहे. हे कसे झाले यावर आता विश्लेषण सुरू झालं आहे. संघाचे स्वयंसेवक रतना शारदा यांनी लिहिलेल्या लेखातून पक्षाच्या काही निर्णयांना यासाठी दोष दिला आहे.

भाजप बहुमतापासून दूर राहण्यास उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील निकाल कारणीभूत ठरले आहेत. महाराष्ट्रातील निकालाची कारणमीमांसा करताना भाजपचं ‘अति राजकारण’ अंगलट आल्याचं त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपकडं पूर्ण बहुमत असताना अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती, असा प्रश्न लेखात उपस्थित करण्यात आला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद होत राहिले असते तर शरद पवार यांचा प्रभाव पुढच्या दोन-तीन वर्षांत असाही संपून गेला असता. मात्र, अजित पवारांना फोडल्याचा परिणाम उलटा झाला. भाजपच्या समर्थकांनाही हे आवडलं नाही. ज्या काँग्रेस व राष्ट्रवादी विरुद्ध वर्षानुवर्षे लढलो त्यांच्याशीच युती करावी लागली. भाजपची प्रतिमा तिथं पूर्ण खालावली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी इतकी वर्षे केलेला संघर्ष वाया गेला. भाजप इतरांसारखाच केवळ एक पक्ष बनून राहिला, असं लेखात नमूद करण्यात आलं आहे.

आरएसएसच्या मुखपत्रानं अजित पवार यांच्याबाबत हे मत व्यक्त केल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं संधी साधली आहे. अजित पवार यांना सोबत घेणं ही चूक होती हे कळल्यामुळं आता विधानसभेत त्यांच्या गटाला बेदखल केलं जाईल. त्यांच्या सोबत आघाडी करायची की नाही यावरही भाजपमध्ये आत्मचिंतन सुरू झालं असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

Protected Content