Home पर्यावरण निसर्ग वाचवण्यासाठी पुढाकार घ्या – वनक्षेत्रपाल शितल नगराळे

निसर्ग वाचवण्यासाठी पुढाकार घ्या – वनक्षेत्रपाल शितल नगराळे


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निसर्ग वाचवणं ही फक्त सरकारची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रीय सहभाग घ्यायला हवा, असं स्पष्ट मत वनक्षेत्रपाल शितल नगराळे यांनी व्यक्त केलं आहे. पाल येथे साजऱ्या झालेल्या वन्यजीव सप्ताह कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना जंगल सफारीद्वारे प्रत्यक्ष अनुभव देत निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नगराळे यांनी उपस्थित शाळकरी विद्यार्थ्यांना निसर्गाचा समतोल का बिघडतोय, याचे वास्तव चित्र उलगडून दाखवले. “एखाद्या भागात अतिवृष्टी, तर दुसऱ्या भागात टोकाचा दुष्काळ – हे निसर्गाचं अपायकारक संकेत आहे. आपणच जर वेळेत या समस्यांकडे गांभीर्याने पाहिलं नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी परिस्थिती हाताबाहेर जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निसर्गाचा अनुभव मिळावा म्हणून, वनक्षेत्रपाल शितल नगराळे यांनी त्यांना जंगल सफारीसाठी नेले. सफारीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध वनस्पती, झाडं, आणि वन्यप्राणी पाहिले. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर “निसर्गाचे सौंदर्य केवळ पुस्तकात नाही, ते अनुभवण्यासाठी जंगलातच यावं लागतं.” विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या अनोख्या अनुभवाचं समाधान स्पष्ट दिसत होतं.

कार्यक्रमाला वनपाल संभाजी सुर्यवंशी, वनरक्षक आर. एम. पाटील, संजय बारेला, राजमल बारेला, रणधीर काटे, मोहसिन तडवी, दिपक बारेला, रियाज तडवी, श्रीमती सकिना तडवी, धनाबाई भादले तसेच शिक्षकवर्ग व वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून निसर्ग संवर्धनाच्या शपथेने कार्यक्रमाचा समारोप केला.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीसाठी स्वयंप्रेरणेने काम करण्याचा निर्धार केला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच निसर्गप्रेम रुजतं आणि भविष्यात ते पर्यावरणाचे खरे संरक्षक बनतात, हेच या कार्यक्रमाचे यश ठरले.


Protected Content

Play sound