जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सात वर्षीय बालकाच्या गंभीर न्युमोनिया आजारावर यशस्वी उपचार करून त्याला नवजीवन दिले आहे. वेळीच निदान आणि तातडीच्या उपचारांमुळे मुलाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून, सध्या तो पूर्णपणे ठणठणीत आहे.
धामणगाव येथील जयेश सपकाळे या सात वर्षीय मुलाला काही दिवसांपासून तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि थकवा जाणवत होता. प्राथमिक उपचारानंतरही सुधारणा न झाल्याने त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालरोगतज्ज्ञांनी तपासणी केली असता त्याला गंभीर न्युमोनिया झाल्याचे निदर्शनास आले. क्ष-किरण आणि रक्ततपासणीद्वारे या आजाराची पुष्टी करण्यात आली.
रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी तातडीने उपचार सुरू केले. अत्याधुनिक वायुवाहक उपचार, अँटिबायोटिक्स आणि नेब्युलायझेशन याद्वारे त्याला आवश्यक औषधोपचार देण्यात आले. तसेच, आयसीयू सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सतत निरीक्षणामुळे मुलाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. विशेष म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत बालकावर मोफत उपचार करण्यात आले. बालरोग तज्ज्ञ डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. चंदाराणी देगूलरकर, डॉ. कुशल धांडे यांनी उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुलाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली.
मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल कुटुंबीयांनी डॉक्टर व रुग्णालय व्यवस्थापनाचे आभार मानले. “आमच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी घेतलेली मेहनत अमूल्य आहे. आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू,” असे बालकाच्या पालकांनी सांगितले.
“लहान मुलांमध्ये न्युमोनिया हा गंभीर आजार असू शकतो. वेळेवर निदान आणि योग्य उपचार झाल्यास त्यावर यशस्वी नियंत्रण मिळवता येते. पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”
– डॉ. ओमश्री गुडे, निवासी डॉक्टर