जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध निंब वृक्षतोड सुरु असून, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वनविभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी करत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कडू निंबाची झाडे सर्रासपणे तोडली जात आहेत. यामुळे तापमानात वाढ होत असून, जिल्ह्यात अनेकवेळा राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. ही गंभीर बाब असून, त्यामागे बेकायदेशीर वृक्षतोड हे मुख्य कारण असल्याचे मनसेने नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, ही अवैध वृक्षतोड करून लाकूड जळगावमधील विविध सॉ मिल्समध्ये पाठवले जात असल्याची माहिती असून, विशेषतः शिवाजीनगर भागातील सॉ मिल्समध्ये मोठ्या प्रमाणात निंब लाकूड साठवले गेले आहे. या साठ्यांसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मनसेने निवेदनात म्हटले आहे की, यामध्ये संबंधित सॉ मिल्स आणि वृक्षतोड करणारे यांच्यात मिलीभगत असल्याची शक्यता असून, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील विटभट्ट्यांवर देखील निंबाचे लाकूड आढळून आल्याने, त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी जिल्हा संघटक राजेंद्र निकम, जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, महानगर संघटक श्रीकृष्ण मेंगडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, तसेच ललित शर्मा, चेतन पवार, महेश माळी, संदीप मांडोळे, साजन पाटील, राहुल चव्हाण, पंकज चौधरी, खुशाल ठाकूर आदी उपस्थित होते.
वनविभागाने तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी आणि अधिकृत परवाना नसलेल्या वाहतुक वाहनांवर देखील नजर ठेवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.