कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

kalburgi

बेंगळुरू, वृत्तसंस्था | कन्नड विचारवंत आणि लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज अमोल काळे, गणेश मिस्कीन, शरद कळसकर, प्रवीण प्रकाश चतुर, वासुदेव भगवान सूर्यवंशी व अमित रामचंद्र बड्डी अशा सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. तीन आरोपी कर्नाटकातील तर तीन आरोपी महाराष्ट्रातील आहेत.

 

डॉ.कलबुर्गी यांची ऑगस्ट २०१५ मध्ये धारवाड येथे त्यांच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. याप्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर आज आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एसआयटीने धारवाड विशेष न्यायालयात सर्व सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, म्हणून कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टाने कर्नाटक हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठाच्या देखरेखीखाली एसआयटीने या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी होऊन सहा आरोपींना एसआयटीने बेड्या ठोकल्या होत्या. या सर्वांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. एम.एम. कलबुर्गी हे प्रसिद्ध कन्नड साहित्यिक तसेच हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू होते. २००६ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

Protected Content