फैजपूर, प्रतिनिधी | शैक्षणिक वाटचालीत इयत्ता दहावी आणि बारावी या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटा आणि नव्या दिशा मिळत असतात. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल कौतुक करणे समाजाचे कर्तव्यच आहे. श्रीराम उद्योग समूहाने याच भावनेतून श्रीराम फाऊंडेशनच्या माध्यमातून येत्या २ ऑगस्टला येथील जेहरा मंगल कार्यालयात विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उद्योजक श्रीराम पाटील यांनी आज (दि.२७) येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक यांचा गुणगौरव सोहळा व शालेय शिक्षणानंतर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर संदर्भात तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचार अध्यक्षस्थानी स्वामीनारायण गुरुकुलचे भक्ती किशोरदास शास्त्री असतील तर मुख्य मार्गदर्शक म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके या असतील. स्पर्धा परीक्षेविषयी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व दर्जी फाउंडेशन संचालक गोपाल दर्जी मार्गदर्शन करतील. दीपप्रज्वलन उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या हस्ते करण्यात येईल. हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नसून हा फक्त विद्यार्थी व शालेय मुख्याध्यापक यांचा गुणगौरव सोहळा आहे. याला कोणीही राजकीय हेतूने बघू नये. श्रीराम फाउंडेशन नेहमी असे कार्य करतच आलेली आहे आणि यापुढेही करतच राहणार आहे,असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अभिलाशा देवगुणे, यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, गटविकास अधिकारी विजय पवार, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन, नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी, उपस्थित असतील. गुणवंत विद्यार्थी पालक आणि शिक्षक बांधवांनी दि. २ ऑगस्ट रोजी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जनसंपर्क अधिकारी दीपक नगरे यांच्यासह आयोजकांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला श्रीराम फाउंडेशनचे उपाध्यक्ष स्वप्नील पाटील, संतोष महाजन, बंडू पाटील, ललित चौधरी, संदीप बारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.