धक्कादायक : समता नगरातील तरूणाने तिसऱ्या मजल्यावरून घेतली उडी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरुणाने महाबळ परिसरातील एका बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कांतीलाल मोहन पवार (वय-२८) रा. समता नगर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कांतीलाल पवार हा आई, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवार ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथून आईसोबत येत असताना आईला दुकानावर जातो, असे सांगून गेला. त्यानंतर महाबळ परिसरातील त्र्यंबकनरातील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तपासणी अंतिम वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन विसपुते यांनी मयत घोषित केले. कांतीलालचे आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. एकुलता एक भाऊ गेल्याने बहिणीचा रूग्णालयात प्रचंड आक्रोश केला होता. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. कांतीलाल याच्या पश्चात आई उषाबाई, पत्नी राणी, मुलगा जयेश (वय-३) आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

Protected Content