विद्यासागर यांच्या पुतळ्यावर हल्ला करणारे माथेफिरूच- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । ईश्‍वरचंद्र विद्यासागर हे बंगालमधील महान समाज सुधारक असून त्यांच्या पुतळ्यावर हल्ला करणारे हे माथेफिरूच असल्याचे सांगत शिवसेनेने आज या प्रकारावर टीका केली आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीआधी भाजप आणि टिएमसीमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली असून यात समाज सुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारावर शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ईश्‍वरचंद्र विद्यासागर बंगालचे शाहू-फुले या शीर्षकाखालील अग्रलेखातून या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या राजकीय साठमारीत ईश्‍वरचंद्र यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली व देशात एकच हलकल्लोळ झाला. विद्यासागर यांच्या पुतळ्याची नासधूस झाल्याबद्दल दिल्ली आणि कोलकात्यात मोर्चे निघाले. ईश्‍वरचंद्र तर कोणत्याही राजकीय पक्षाचे चार आण्याचे सदस्य नव्हते. दोन वाक्यांत त्यांचे वर्णन करायचे तर ते एक सुधारक संत होते. मानवतेचे महान दैवत होते. महात्मा फुले यांच्याप्रमाणेच त्यांच्याही मनात हेच होते की, या देशाचा शत्रू इंग्रज नाही. अज्ञान, रूढी-परंपरांच्या बेडया, सामाजिक विषमता हेच खरे शत्रू आहेत. १८५६ साली विधवा विवाहाचा कायदा संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बालविवाहास त्यांनी विरोध केला. स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांनी त्या चौदा-पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केली नाहीत. ईश्‍वरचंद्रांनी गरीबांसाठी व बहुजन समाजासाठी शिक्षण संस्था उघडल्या. स्त्राीजातीच्या उद्धारासाठी त्यांचे योगदान अभूतपूर्व होते. सारे जग त्यांना विद्यासागर म्हणून ओळखत असले तरी प. बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना दयासागर म्हणून अधिक ओळखते.

अग्रलेखात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांची २०० वी जयंती सुरू होत असतानाच कोलकात्याच्या कॉलेज रोडवरील त्यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली. त्यांचा पुतळा ज्यांनी तोडला ते विद्यासागर यांचा सामाजिक विचार कसा संपवणार? ईश्‍वरचंद्र हे साहित्य, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातले शिखरपुरुष होते. कोलकाता संस्कृत महाविद्यालयात ते शिकले व त्याच महाविद्यालयाने त्यांना विद्यासागर (जलशरप ेष ङशरीपळपस) ही उपाधी दिली. तीच आजन्म त्यांना चिकटली. त्यांच्या नावाने विद्यापीठे उभी राहिली. त्याच विद्यापीठाच्या आवारातला या महापुरुषाचा पुतळा तोडण्यात आला. नवा पुतळा उभारला जाईल, पण विद्यासागर यांच्या पुतळयावर हल्ला करणारे माथेफिरू आहेत. त्यांना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांचा अर्थ समजलेला नसल्याचे यात सांगण्यात आलेले आहे.

Add Comment

Protected Content