राजांना लागतेय शिस्तीचे वळण !- शिवसेना

udayanraje bhosale

मुंबई प्रतिनिधी । छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरून आज शिवसेनेने जोरदार टोलेबाजी करत त्यांना शिस्तीचे वळण लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. याआधी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामादेखील दिला आहे. या घटनेवर शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामना या वर्तमानपत्रातील संपादकीयमध्ये आज भाष्य करण्यात आले आहे. सातारचे राजे या शीर्षकाखालील या अग्रलेखामध्ये उदयनराजे भोसले यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, भाजपने भागाभागातील सरदार, संस्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले व आता थेट सातारच्या राजांना प्रवेश देऊन मस्व-राज्यफ आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले. सातारचे राजे युती परिवारात आले याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता आणि साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन अशा शब्दात या अग्रलेखातून जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे.

Protected Content